मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) च्या मुंबईमधील ऑफिसात 9 सप्टेंबर रोजी बीएमसीनं बेकायदेशीर बांधकाम असल्याचं सांगत तोडफोड केली होती. यावर आता मुंबई हायकोर्टानं (HIGH COURT OF BOMBAY) निर्णय दिला आहे. कोर्टानं म्हटलं आहे की, बीएमसची ही अॅक्शन सूडाच्या भावनेतून घेतली आहे. या तोडफोडीसाठी आता बीएमसीनं नुकसानभरपाई द्यायची आहे, असंही कोर्टानं सांगितलं आहे. यावर आता कंगनाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर तिनं आनंद व्यक्त केला आहे आणि टीकाकारांवर निशाणाही साधला आहे.
कंगनानं ट्विट करत तिचं म्हणणं मांडलं आहे. कंगना म्हणते, हा माझा एकटीचा विजय नाही. लोकशाहीचा विजय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते तो तिचा एकटीचा विजय नसतो, तो लोकशाहीचा विजय असतो, असंही ती म्हणाली आहे.
— TimePass (@TimePassTalks) November 27, 2020
इतकंच नाही तर टीकाकारांना टोला लगावत तिनं त्यांचे आभार मानले आहेत. माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यानंतर त्यावर हसणाऱ्यांचेही मी आभार मानते. तुम्ही व्हिलनची भूमिका पार पाडलीत म्हणूनच मी आज हिरो होऊ शकले, असंही ती आपल्या ट्विटमध्ये म्हणाली आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवीमध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.