कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा आरोप, आदित्य ठाकरेंवरही साधला थेट निशाणा ! म्हणाली…

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईवरून चंदीगडला गेलेल्या बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत निशाणा साधला आहे. सुशांतच्या हत्येला जबाबदार असणारे आणि बॉलिवूडमधील माफिया, ड्रग्स रॅकेट या सगळ्यांचे कारनामे मी उघड केले हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण आहे. या सगळ्या गँगसोबत आदित्य ठाकरे यांची जवळीक आहे हे सगळं उघड करणं हाच माझा सगळ्यात मोठा गुन्हा आहे असं कंगना म्हणाली आहे.

कंगना असंही म्हणाली की, “मी या सगळ्यांचे उद्योग उघड केल्यानंच मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पाहूया नेमकं कोण जाळ्यात अडकतं ते.” कंगनानं ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.

शिवसेना प्रवक्ते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी कंगंनाला तीव्र शब्दात सुनावलं आहे. ते म्हणाले की, “कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिला योग्य वाटत असेल तिथं तिनं राहावं. कंगनानं आपला बोरिया बिस्तर गुंडाळावा. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल तर आम्ही ऐकून घेणार नाही. कंगनानं आपलं बस्तान उचलावं हे योग्य ठरेल” असं म्हणत अनिल परब यांनी इशारा दिला आहे.

कंगना प्रकरण आमच्यासाठी बंद झालं आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र या प्रकरणातील सर्व घडामोडींवर आमचं लक्ष आहे असं सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी रविवारी केलं होतं.