‘त्या’ सर्वांची तोंडं काळी करून गेली कंगना, शिवसेनेच्या ‘वजनदार’ आमदाराचा ‘घणाघात’

बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. यानंतर ती शिवसेनेच्या रडारवर आली होती. आज ती मुंबईहून हिमाचल प्रदेशसाठी रवाना झाली. ती गेल्यानंतर आता ही संधी साधत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अंत्यंत शेलक्या शब्दात विरोधकांवर निशाणा साधला आहे.

कुत्रीचे शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडंच या म्हणीचा अर्थ आज मला तंतोतंत कळाला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली. त्या सर्वांची तोंडं काळी करून ती आज गेली. आता मारा बोंबा. जय महाराष्ट्र” असं ते म्हणाले आहेत. प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत आपलं म्हणणं माडंलं आहे.

मुंबई आणि मुंबई पोलिसांचा अपमान केल्यानंतर खासदार संजय राऊत यांच्यासोबतच सरनाईक यांनीही तिच्याविरोधात आघाडी उघडली होती. कंगना मुंबईत आल्यानंतर आमच्या रणरागिनी तिचं थोबाड फोडतील असा इशारा सरनाईक यांनी दिला होता. यानंतर कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्या भाजपनं राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत ठाकरे सरकारवर टीका केली होती.