तर मग लॉकडाउनआधी PM मोदींनी भारतीयांना वेळ का नाही दिला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना काँग्रेस नेते पवन खेडा यांनी प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला आहे. घरावरील कारवाईवरून कंगनाने दिवसभर ट्विटरवरून थयथयाट केला. अनेक वृत्तवाहिन्यांनी मुंबई महापालिकेने कंगनाला पाठवण्यात आलेल्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी वेळ का दिला नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर खेडा यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेच्या कारवाईसंदर्भात प्रसारमाध्यमांकडून उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्नांवरुन खेडा यांनी थेट मोदी सरकारवर टीका केली. लॉकडाउनच्या निर्णयाच्या वेळी मोदी यांनी भारतीयांना सरकारने आणखीन वेळ का दिला नाही असा प्रश्न त्यांनी वृत्तवाहिन्यांना विचारला आहे. मुंबई महानगरपालिकेने कंगना रणोतला कार्यालयामधील अनियमित बांधकाम हटवण्यासाठी वेळ का नाही दिला? असा प्रश्न आता काही वृत्तवाहिन्या विचारत आहेत. या त्याच वृत्तवाहिन्या आहेत ज्यांनी लॉकडाउन करण्याआधी करोडो भारतीयांना वेळ का नाही दिला असा प्रश्न पंतप्रधानांना एकदाही विचारलेला नाही, अशा शब्दांमध्ये खेडा यांनी वृत्तवाहिन्यांचा समाचार घेतला.