नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून कपिल सिब्बल यांचा गृहमंत्री अमित शहांवर ‘हल्लाबोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विधेयकावर बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवर देशाच्या फाळणीचा आरोप केला होता. यावर सिब्बल यांनी आक्षेप घेतला. द्विराष्ट्र सिद्धांत आमचा नव्हे, सावरकरांचा आहे, असे खडे बोलही त्यांनी शहांना सुनावले.

कपिल सिब्बल म्हणाले, “द्विराष्ट्राचा सिद्धांत आमचा नव्हे, सावरकरांचा आहे. मी गृहमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आपला आरोप मागे घ्यावा. हे विधेयक द्विराष्ट्र सिद्धांताला घटनात्मक दर्जा देणारं आहे. हे विधेयक नागरिकत्वासाठी धर्माला आधार बनवणारं आहे. मला कळत नाही की अमित शहा कोणत्या इतिहासाची पुस्तके वाचली आहेत. द्विराष्ट्राचा सिद्धांत आमचा नाही. तो सावरकरांनी मांडला होता.”

मुस्लिमांना घाबरण्याचं कारण नाही, असे अमित शहा म्हणाले होते. त्याचाही सिब्बल यांनी समाचार घेताना, “आम्ही किंवा या देशाचे मुसलमान तुम्हाला किंवा तुमच्या सरकारला घाबरत नाहीत. आम्ही ते लोक आहोत, जे केवळ घटनेला घाबरतात” असे कपिल सिब्बल म्हणाले. तसेच हे विधेयक देशाला तोडणारं असल्याचे कपिल सिब्बल यांनी यावेळी म्हटले आहे.

Visit : policenama.com