‘केरळमधील लोक सुशिक्षित, म्हणून भाजपला मिळत नाहीत मते’; भाजपला घरचा आहेेर

पोलीसनामा ऑनलाईन : केरळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या दरम्यान आरोप – प्रत्यारोपाचे सत्र सुरू असताना राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याने असे काहीतरी म्हटले आहे, जे पक्षाच्या डोकेदुखीचे कारण बनू शकते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे एकमेव आमदार असलेले राजगोपाल म्हणाले की, केरळमध्ये भाजपा न वाढण्याचे कारण राज्यातील उच्च साक्षरता दर आहे. राजगोपाल म्हणाले की, इथले लोक सुशिक्षित आहेत आणि मत देण्यापूर्वी विचार करतात.

दरम्यान, केरळच्या 140-सदस्यीय विधानसभेसाठी 6 एप्रिल रोजी एकाच वेळी मतदान होईल. याचा निकाल 2 मे रोजी येईल. राज्यात सध्या मोठी मोहीम सुरू आहे. डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ याक्षणी राज्यात सत्तेत आहे. तर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ ही मुख्य विरोधी युती आहे. या दोन गटांमध्ये भाजप आपली जमीन तयार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. मात्र, ओ. राजगोपाल यांच्या या विधानामुळे भाजपला प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो.

भाजपचे ज्येष्ठ नेते ओ राजागोपाल यांनी एका मुलाखतीत केरळमधील भाजपसंदर्भातील परिस्थिती स्पष्ट केली. नेमोम विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार ओ राजगोपाल यांना विचारले की, केरळमध्ये भाजपा आपले राजकीय आधार का तयार करू शकत नाही, तर हरियाणा आणि त्रिपुरामध्ये पक्ष मोठ्या प्रमाणात सत्तेत आला आणि पश्चिम बंगालमधील एक मुख्य राजकीय पक्ष म्हणून उदयास आला आहे? त्याला उत्तर म्हणून ओ राजागोपाल म्हणाले, “केरळ हे वेगळ्या प्रकारचे राज्य आहे. येथे दोन कारणे आहेत ज्यामुळे ती इतर ठिकाणांपेक्षा वेगळी झाली आहे. केरळमध्ये साक्षरता टक्केवारी 90 टक्के आहे, हे लोक विचार करतात, सुशिक्षित लोकांची ही सवय आहे, हा एक मुद्दा आहे. ”

केरळमध्ये भाजपच्या मागासलेपणाचे अन्य कारण सांगताना ओ राजगोपाल म्हणाले की, दुसरे म्हणजे राज्यात 55 टक्के हिंदू आणि 45 टक्के अल्पसंख्यक आहेत, त्यामुळे इथल्या प्रत्येक राजकीय गुणामध्ये हे पैलू समोर येतात. ते म्हणाले की, म्हणून केरळची तुलना इतर राज्यांशी करता येणार नाही. इथली परिस्थिती वेगळी आहे, परंतु आपण हळू हळू योग्य स्थितीत वाटचाल करत आहोत.