‘खडसे आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू’ : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य केलं आहे. खडसे आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू असं चव्हाण म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर रोष दाखवला. त्याना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला असा त्यांनी आरोप केला. त्यांनी पक्षांतर केलं आहे. त्यांना माझ्या सदिच्छा आहेत असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी खडसेंना शुभेच्छाही दिल्या.

कराड येथे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचं महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवही तोफ डागली.

ते म्हणाले, “निवडणूक जिंकणं एवढाच विषय केंद्र सरकारसमोर आहे. बाकी कशाचं देणंघेणं नाही. बिहारची निवडणूक (Bihar Election 2020) सुरू आहे. भाजपनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात बिहारमध्ये फुकट कोरोनाची लस (Corona Vaccine) देऊ असं जाहीर केलं. मी त्या वक्तव्याचा निषेध केला. केंद्र सरकारला असं बिहारपुरतं करता येणार नाही. केवळ राजकारणासाठी, मतं मिळवण्यासाठी लस देणं निषेधार्थ आहे. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांना सर्वच राज्यांना लस द्यावी लागेल. महामारीबद्दल राजकारण करू नये असं आमचं म्हणणं आहे. मोदी सरकारला केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांना लोकांचं, शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नाही. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली याकडे लक्ष नाही. फक्त निवडणूक जिंकणे एवढाच विषय त्यांच्यासमोर आहे”