शेतकरी आंदोलन : खलिस्तानीसोबतच असामाजिक घटकांची घुसखोरी, कॉंग्रेसच्या ‘या’ खासदाराचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे पंजाबसह संपूर्ण देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खलिस्तानी आंदोलकांसोबतच काही असामाजिक घटकांनीही घुसखोरी केल्याचा दावा काँग्रेसचे लुधियानामधील खासदार रवनीत बिट्टू यांनी केला आहे. ज्यांची आंदोलने अपयशी ठरली आहेत, ते आता शेतकऱ्यांचा फायदा उठवू पाहत आहेत, असेही खा. बिट्टू यांनी म्हटले आहे.

खासदार बिट्टू म्हणाले की, वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या मुलींना शिवीगाळ केली जात आहे. हे कसल पंजाब आहे. पंजाबमधील शेतकरी असे करू शकत नाहीत. ठोक देंगेसारखी भाषा पंजाबची नाही आहे. अशी भाषा बोलणारे असामाजिक आहेत. पंतप्रधानांना मारू किंवा अन्य कुणाला मारू अशी भाषा शेतकरी वापरू शकत नाहीत. मी या आंदोलनामध्ये हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या लोकांना फिरताना पाहिले आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

खा. बिट्टू म्हणाले की, शेतकरी शांततेने आंदोलनाला बसले आहेत. तीन महिने पंजाबमध्ये आंदोलन सुरू असताना काही झाले नाही. पंजाब सरकारने हे आंदोलन शांततेने व्हावे, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीसह पाच ते पन्नास हजार जण आहेत. हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. आता नेत्यांनी पुढे येऊन यावर नियंत्रण मिळवले पाहिजे कारण अनेक जण हे आंदोलन अपयशी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
हे आंदोलन थांबवले नाही तर ते वाढत जाईल. केवळ अमित शाहाच हे आंदोलन थांबवू शकतात. शेतकऱ्यांनाही तसेच वाटते. शेतकऱ्यांना ना कृषिमंत्र्यांवर विश्वास आहे. ना अन्य कुणावर, असेही बिट्टू यांनी सांगितले.

कोण आहेत खासदार रवनीत सिंह बिट्टू
खाससदार रवनीत सिंह बिट्टू हे काँग्रेसचे युवा नेते आहे. ते लुधियाना येथील खासदार आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. रवनीत सिंह बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. बेअंत सिंह यांची मुख्यमंत्री असताना हत्या झाली होती.