उल्हासनगर : वृत्तसंस्था – ठाणे येथील उल्हासनगरमध्ये दोन चाकी गाडीला कट मारल्याच्या वादातून रात्री उशिर एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उल्हासनगरमधील कॅम्प ३ परिसरातील सम्राट अशोक नगरमध्ये नवीन चौधरी नावाच्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींसोबत गाडीला कट मारल्याने वाद झाला. दरम्यान याच वादातून नवीन चौधरी या तरुणाची हत्या झाली. विशेष म्हणजे शिवसेना विभाग प्रमुख दशरथ चौधरी यांचा नवीन चौधरी हा पुतण्या आहे. नवीनची हत्या केल्यानंतर गुंडांनी परिसरात तलवारी घेऊन हैदोस घातला आणि चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
यासंदर्भात पोलीस तक्रार केली असतांनाही पोलिसांनी तातडीने घटनेची दखल घेतली नाही असा आरोप स्थानिकांनी पोलिसांवर केला आहे. परंतु काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.