‘ही वेळ राजकारणाची नाही’ म्हणत मुंब्र्यात गेलेल्या किरीट सोमय्यांना शानू पठाण यांनी पिटाळलं

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयात आग लागून चौघांचा मृत्यू झाला. दरम्यान या दुर्घटनेनंतर घटनास्थळी येऊन ठाकरे सरकारच्या काळात कोविड हत्याकांड सुरु असल्याचे विधान करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी चांगलेच फटकारले. आम्ही जनतेचे जीव वाचविण्याला महत्व देत आहोत. प्रत्यक्ष मदतीच्या वेळी घरात बसणारे येथे येऊन राजकारण करीत असतील तर ते खपवून घेणार नाही. ही वेळ राजकारणाची नाही. जगलो तर राजकारण करुच, पण, टीका करण्यापूर्वी हिम्मत असेल तर केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळवून दाखवा, अशा शब्दात पठाण यांनी सोमय्याचा समाचार घेतला आहे. यावेळी सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे कोविड रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करणार्‍या सोमय्यांना आल्या पावली परतावे लागले.

यावेळी पठाण म्हणाले की, दुर्घटना घडल्यानंतर राजकारण करण्यासाठी सोमय्या येथे आले आहेत. जेव्हा मुंब्रा-कौसा भागात अनेक लोक मरत होते, तेंव्हा हे कुठे होते? रात्री लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता आम्ही रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यावेळी सोमय्या कुठे होते. डॉ. जितेंद्र आव्हाड हे दिवसरात्र काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रुग्णांसाठी मदत करीत आहोत. आता हे लोक येऊन टीका करीत आहेत. अशी फुकटची टीका आम्ही सहन करणार नाही. हा मुंब्रा आहे. आज टीका करणार्‍यांची सत्ता केंद्रात आहे. महाराष्ट्रावर टीका करताना जरा स्वत:च्या अंतर्मनातही बघा. भाजपची सत्ता असलेल्या गुजरात, मध्यप्रदेशातील मृत्यूदर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. या संकटात राजकारण बाजूला ठेवण्याची वेळ आहे. मात्र सोमय्यांसारखे लोक लोकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याऐवजी सर्व संपल्यावर राजकारण करण्यासाठी येतात. त्यांनी आता तरी राजकारण बाजूला ठेवावे. हिम्मत असेल तर केंद्राला त्यांनी सांगावे अन् ठाकरे सरकारच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात सहभागी व्हावे. महाराष्ट्राची अडवणूक करणार्‍या केंद्र सरकारला सोमय्यांनी जाब विचारावा, अशा शब्दात सोमय्या यांचा पठाण यांनी समाचार घेतला.