25 वर्षे सत्तेची बोर चाखलेली आता शड्डू ठोकत असतील तर…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईनः ज्यांनी गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेत आमच्यासोबत बोर चाखली तोच पक्ष आता आमच्यासमोर शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्विकारले असे समजा, अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर( Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांनी भाजपला जोरदार प्रत्युतर दिले आहे. राजाचा जीव जर पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय? असा सवाल उपस्थित करत किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचाही समाचार घेतला.

दोन वर्षांनी होणा-या महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणसिंग फुंकले असून मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार भाजपने केला आहे. यावर महापौर पेडणेकर यांनी सडकून टीका केली आहे.

भाजपच्या मुंबईतील बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर स्वबळावर झेंड फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी ‘राजाचा जीव ज्याप्रमाणे पोपटात असतो, तसा काहींचा जीव मुंबई महापालिकेत अडकला आहे, असे नाव न घेता शिवसेनेवर टीका केली होती. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या अतुल भातखळकर यांना भाजपने प्रभारी म्हणून जाहीर केले आहे. यावरही किशोरी पेडणेकर यांनी हल्लाबोल केला. भातखळकर यांच्यावर मुंबईची जबाबदारी असेल तर मग आशिष शेलार काय करणार? शेलारांच्या नेतृत्वात मागची निवडणूक लढली गेली होती. त्यांच्या अभ्यास चांगला आहे, मग नेतृत्व बदल का? भाजपमध्ये अंतर्गत वाद तर नाही ना?’, असा खोचक टोलाही पेडणेकर यांनी भाजपाल लगावला आहे.