तुम्हाला माहित आहे का ? ‘रामा’च्या बहिणीचे नाव ? तिचे बंधू कोणाचे ‘अवतार’ ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रामायण हे आयुष्य कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन करणारे महाकाव्य आहे. मूळ रामायण वाल्मिकींनी लिहिले असले, तरी अनेकांनी ते विविध भाषांमध्ये अनुवादित केले आहे. वाल्मिकी रामायणानंतर तुलसीदासांचे रामचरितमानस प्रमाण मानले जाते. श्रीविष्णूंचा अवतार असलेल्या रामाला एक बहीणही होती. मात्र, त्याबाबत अधिक माहिती नाही. राम जसे श्रीविष्णूंचे अवतार होते, तसे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न कोणाचे अवतार होते? जाणून घेऊया…

कोण होती रामाची बहीण ?

अयोध्येचा राजा दशरथाला चार पुत्र होते. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. मात्र, दशरथ राजाला एक मुलगी होती आणि ती या भावंडांमध्ये सर्वांत मोठी होती. तिचे नाव होते शांता. ती कौसल्या राणीची मुलगी होती. एकदा अंग देशाचे राजा रोमपद आणि त्यांची पत्नी वर्षीणी अयोध्येत आले होते. त्यांना अपत्य नव्हते. एका चर्चेवेळी राजा दशरथांना ते समजले. आपली मुलगी शांता त्यांना दत्तक देण्याचा निर्णय दशरथाने घेतला. दशरथाचा निर्णय ऐकताच राजा रोमपद आणि राणी वर्षीणी प्रसन्न झाले. त्यांनी तिचा उत्तम प्रकारे सांभाळ केला. उत्तर रामायणात रामाने सीतेचा त्याग केल्याचे समजताच ती रामाला खूप रागे भरते, अशी आख्यायिका आढळून येते. हिमाचल प्रदेशमधील कुल्लूजवळ शांता देवीचे मंदिर आहे. ही शांता देवी श्रीरामांची बहीण असल्याचे सांगितले जाते.

श्रीराम कोणाचे अवतार ?

जगत्कल्याणासाठी श्रीविष्णूंनी प्रत्येक युगात अवतार घेतले. श्रीविष्णूंचे दशावतार सर्वांनाच माहिती आहेत. रावण वधासाठी श्रीविष्णूंनी रामवतार धारण केल्याचे सांगितले जाते. त्याचप्रमाणे धर्म, तत्त्व, मर्यादा यांचा एक आदर्श वस्तूपाठ रामायणाच्या निमित्ताने घालून देण्याचे काम हे अवतारकार्य करते, असे सांगितले जाते. अवतार असूनही मानवी जीवनाचे भोग भोगावे लागतात. आपले कर्म आणि आपले आचरण यातून मानव देवपणाला गवसणी घालू शकतो, असाही संदेश यातून मिळतो. श्रीविष्णूंनी रामवतार धारण केला. पण त्यांच्यासोबत शेषनाग, सुदर्शन चक्र आणि शंख यांनीही आपापले अवतार धारण केले. दशावतारामध्ये रामवताराच्या निमित्ताने या सर्वांनीही आपली प्रमुख भूमिका निभावली, असे सांगितले जाते.

लक्ष्मण कोणाचा अवतार?

आदर्श भावंडे म्हणून राम-लक्ष्मण या जोडीचे नेहमी उदाहरण दिले जाते. धर्म, तत्त्व, मर्यादा याचे रामाने नेहमी तंतोतंत पालन केले आणि लक्ष्मणासह अन्य भावांनी त्याला यथोचित साथ दिली. वनवास आणि उत्तर रामायणात लक्ष्मण सदैव रामांसोबत असायचा. श्रीराम हा श्रीविष्णूंचा अवतार होता. क्षीरसागरात शेषनागावर आरूढ असलेल्या विष्णूंचे छायाचित्र आपण अनेकदा पाहतो. लक्ष्मण हा त्याच शेषनागाचा अवतार होता, असे मानले जाते. त्यामुळे अवतारकार्याच्या सांगतेची सुरुवात लक्ष्मणापासून झाली, असे सांगितले जाते.

भरत

राणी कैकयीचा पुत्र भरत. भरताचे रामावर प्रचंड प्रेम होते, असे सांगितले जाते. कैकयीच्या वचनामुळे राम वनवासात गेल्यानंतर रामाप्रमाणे सन्यासीरुपात राहून भरताने रामराज्य सांभाळले. त्याला सिंहासनाचा मोह कधीच नव्हता. आपल्या अनेक कृतीतून त्याने दाखवून दिले होते. धर्मपरायण भरत हा सुदर्शन चक्राचा अवतार होता, असे मानले जाते. श्रीविष्णूंचे प्रभावी अस्त्र म्हणून सुदर्शन चक्राचा उल्लेख केला जातो. त्यामुळे रामाने अवतारकार्याची समाप्ती केल्यानंतर भरतही रामाच्या मागे समाधीस्त झाल्याचे सांगितले जाते.

शत्रुघ्न

राम, लक्ष्मण, भरत यांचा सर्वांत धाकटा बंधू म्हणजे शत्रुघ्न. शत्रुघ्नविषयी रामायणात फारशी माहिती येत नाही. रामाचा वनवास आणि भरताच्या नंदीग्राम काळात महालातील व्यवस्थापन, आईंची, वहिनींची देखभाल करत असतो. इतकीच माहिती त्याबद्दल आढळून येते. मात्र, शत्रुघ्न हादेखील अवतारी पुरुष असतो. शत्रुघ्न हा शंखाचा अवतार मानला जातो. राम, लक्ष्मण, भरत यांनी अवतारकार्याची सांगता केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ शत्रुघ्नही समाधीस्त होतो, असे सांगितले जाते. तर, सीता माता ही लक्ष्मी देवीचा अंश होती, अशी मान्यता आहे.