‘गुढी पाडव्या’सह मराठी वर्षातील ‘या’ 16 तिथींना सर्वाधिक महत्व, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी नववर्षाचा प्रारंभ हा गुढी पाडव्याने होतो. बह्मदेवांनी सृष्टी निर्माण केल्यानंतर कालमापनासाठी तिथींचीही निर्मिती केली, अशी मान्यता आहे. प्रत्येक मराठी महिन्यात प्रतिपदेपासून ते पौर्णिमा, अमावास्येपर्यंत तिथींची कालगणना केली जाते. मराठी महिन्यांचे दोन भाग पडतात. एक शुद्ध पक्ष आणि दुसरा वद्य पक्ष. प्रत्येक शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात १५ दिवस येतात. दोन्ही पक्षांचा मिळून महिना तयार होतो. मराठी नववर्ष हे निसर्ग चक्रानुसार चालते.प्रत्येक मराठी महिन्यात दोनवेळा तिथी येतात. कोणत्या आहेत त्या तिथी? कोणत्या महिन्यात त्या येतात? जाणून घेऊया…

1 . गुढी पाडवा

भारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र प्रतिपदेला दुर्गा देवी प्रकट झाली आणि देवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली. म्हणून चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे केले जाते, अशी मान्यता आहे. वालीचा वध करून श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

2 . यमद्वितीया

कार्तिक शुद्ध द्वितीया यमद्वितीया म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले, म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळावे, यासाठी प्रार्थना करते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात.

3 . अक्षय्य तृतीया

साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे. वैशाख शुद्ध तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून साजरी केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते. या दिवशी व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून खुद्द गणपतीने काम केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले, असे मानले जाते. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.

4 . गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी म्हणजे भारतीयांचा आवडता सण . भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला, असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते. भाद्रपद चतुर्थीला घरोघरी गणपतीच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीला या पार्थिव मूर्तींचे विसर्जन केले जाते. महाराष्ट्रात प्राचीन काळापासून हा सण सुरू असून, लोकमान्य टिळक यांनी त्याला सार्वजनिक केले आणि जागोजागी गणेशोत्सवास सुरुवात झाली. या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते.

5 . नागपंचमी
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित परत आले, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. या दिवशी शेतकरी आपले शेत नांगरत नाहीत. कोणीही खणायचे नाही; घरात काहीही चिरायचे नाही; तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही, असे काही नियम पालन करण्याची प्रथा, परंपरा आहे. या दिवशी अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची या दिवशी पूजा केली जाते.

6 . चंपाषष्ठी
चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. यास खंडोबाचें नवरात्र असेही म्हणतात. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात. ‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता. भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले ७ कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले होते.

7 . रथ सप्तमी
सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. माघ शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे, असा संदर्भ रथसप्तमीला आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे.

8 . गोकुळाष्टमी 

श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने कंसभयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंद-यशोदेकडे पोहोचविले. गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदी आनंद झाला. भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी येथे हा सणाला फार महत्त्व आहे. महाभारतामध्ये कृष्णाचे कार्य महत्त्वाचे आहे. कारण कृष्णाने अर्जुनाला योग्य वेळी अचूक उपदेश केल्यामुळेच पांडव महाभारतातील धर्मयुद्ध जिंकू शकले.

9 . राम नवमी
मर्यादा पुरुषोत्तम, अयोध्येचा आदर्श राजा, सत्यवचनी, भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला. अलौकिक, दिव्य पुरुष आणि रघुकुलदीपक असलेल्या श्रीरामांच्या नावाने ही तिथी राम नवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला, असे सांगण्यात येते. श्रीराम आणि हनुमानाला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदास जयंती याच दिवशी साजरी केली जाते.

10 . विजयादशमी

साडेतील मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन व शमीपूजन आणि शस्त्रपूजा करतात. प्रारंभी हा एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. विजयादशमीला रावणाचा जन्म झाला आणि वधही, असेही म्हटले जाते. मात्र, याबाबत मतमतांतरे आहेत.

11 . आषाढी/कार्तिकी एकादशी

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा चातुर्मासाचा काळ असतो. या दोन्ही तिथींना महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. राज्याच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म गजानन महाराज, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूतून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी पंढरपुरात दाखल होते.

12 . वामन द्वादशी

भाद्रपद शुद्ध द्वादशी या तिथीला विष्णूंनी आपला पाचवा वामनावतार धारण केला. त्यामुळे ही तिथी वामन द्वादशी म्हणून साजरी केली जाते. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्याच्या बहाण्याने दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावलांची भूमी मागतो. बळी श्रीविष्णूला तीन पावलांची जमीन देण्याचे वचन देतात. वामन स्वरुपातील विष्णू भगवान एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वीला व्यापतात आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू, असे विचारतात. शेवटी राजा बळी भगवंतासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो.

13 . धनत्रयोदशी 

धनत्रयोदशी म्हणजेच आश्विन वद्य त्रयोदशी. या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. इंद्राने असुरांना सोबत घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली, अशी मान्यता असल्यामुळे या दिवशी लक्ष्मी देवीची पूजाही केली जाते. त्याचप्रमाणे आश्विन वद्य त्रयोदशीला यमदीपदान केले जाते. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो, अशी मान्यता आहे.

14 . नरक चतुर्दशी/वैकुंठ चतुर्दशी

आश्विन कृष्ण चतुर्दशी ही नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते, असे मानले जाते. रावणाचा वध झाला, तेव्हा पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला, असे सांगितले जाते. गोव्यात हा सण वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने साजरा केला जातो. नरकासुराची प्रतिकृती तयार करून नरकासुर दहन केले जाते. दीपोत्सवातील चौथ्या दिवशी नरक चतुर्दशी येते.

15 . नारळी पौर्णिमा

श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानलेले आहे. हाच दिवस रक्षाबंधन म्हणूनही साजरा केला जातो. भावाच्या हातावर राखी बांधून बहीण त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

16 . दीप अमावास्या

चैत्र ते फाल्गुन या मराठी वर्षातील विविध अमावास्यांना विशिष्ट महत्त्व आहे. यामधील आषाढी अमावास्येला दीप अमावास्या म्हटले जाते. या दिवशी मांगल्याचे प्रतीक असलेल्या दिव्यांची पूजा केली जाते. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भाद्रपद अमावास्येला सर्वपित्री अमावास्या म्हटले जाते. या दिवशी पितरांचे, पूर्वजांचे स्मरण केले जाते. तर आश्विन अमावास्येला लक्ष्मी पूजन केले जाते. दीपोत्सवातील हा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो.