डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करण्याची गरज : जयंत पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या भीतीने डॉक्टरांकडून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत. अनेक ठिकाणी रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर अशी स्थिती आहे. त्यामुळे मृत्यूदर वाढत आहे. ही स्थिती अशीच सुरु राहिल्यास रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करावे लागेल, असे मत जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या रुग्णांच्या लुटीबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने सुरु केलेल्या कोविड रुग्णालयाच्या उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते 100 खाटांच्या कोविड केंद्राचे उद्घाटन आज (रविवार) सकाळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी बोलताना पाटील यांनी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, अनेक रुग्णालयांबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टर बाहेर आणि पेशंट आत हे बरोबर नाही. डॉक्टर आत जात नसतील तर उपचार कसे होणार ? हा प्रकार गंभीर आहे. मी यावर कधी बोललो नाही, पण आता मृत्यू दर कमी येत नसल्याने यावर बोललेच पाहिजे. रुग्णांची काळजी डॉक्टरांनी घेतली तरच मृत्यू दर कमी होईल. ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही ऑडिट करण्याची गरज आहे. याबाबत आमच्यासह डॉक्टरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

आरोग्य यंत्रणांनी प्रामाणीकपणे काम करावे

खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या लुटीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालये भरमसाठ पैसे उकळतात. रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनेक तक्रारी येत आहेत. लुटीच्या भीतीने लोक आजार लपवत आहेत. उपचारात टाळाटाळ केल्याने अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला अखेरच्या क्षणी रुग्णालयात दाखल करण्यात येते. वेळ निघून गेल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू होतो. यातून वाढणारा मृत्यू दर रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी प्रामाणिकपणे काम करावे असे पाटील यांनी म्हटले.