‘या’ 3 जिल्ह्यातील 2 मंत्री, 2 खासदारांसह 14 आमदारांना ‘कोरोना’ची लागण

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील दोन मंत्री, दोन खासदार यांच्यासह १४ आमदारांना कोरोना झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे तर काही अजून उपचार घेत आहेत. मुंबई आणि पुणे यांच्यानंतर आता कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३५ हजार, सांगलीत २५ हजार तर साताऱ्यातही २१ हजारावर कोरोना रुग्ण आढळले आहेत.

आतापर्यंत या जिल्ह्यांत कोरोनाने २५०० च्या वर बळी घेतले आहेत. उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासह आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधी हतबल झाले आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक राजकीय व्यक्तींना कोरोना झाला आहे. लोकांशी होणार संपर्क यामुळे अनेक आमदारानां कोरोनाची लागण झाली आहे. या मध्ये सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रतिनिधी कोरोनाशी लढा दिला आहे. सांगली जिल्ह्यांचे पालकमंत्री जयंत पाटील आणि आमदार मानसिंग नाईक वगळता इतर ९ आमदारानां कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यावर सुद्धा त्या सगळ्या आमदारांनी मात केली आहे. सध्या राज्यमंत्री विश्वजित कदम कोरोनावर उपचार घेत आहेत. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुमन पाटील अनिल बाबर, विक्रम सावंत, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनी कोरोनावर मात केली आहे. या आजारामुळे जिल्ह्याचे माजी महापौर हारुण शिकलगार यांचा मात्र मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार प्रा. संजय मंडलिक हे कोरोना बाधित असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार चालू आहेत. याशिवाय आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार मकरंद पाटील यांनीदेखील कोरोनावर मात केली आहे. राजकीय व्यक्तींचा दिवसभर विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क येतो. बैठका आणि भेटीगाठी यातून त्याचा अधिकाऱ्यांनाही फटका बसत आहे. या तीन जिल्ह्यातील अनेक लोकांना त्याचा फटका बसला आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे.