कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन – Kolkata Hotel Fire | कोलकाता येथील फलपट्टी मच्छुआ भागातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आग आटोक्यात आली आहे. २२ जणांना वाचविण्यात आले आहे. काही लोक अजूनही आत अडकल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रात्री सव्वा आठ वाजता ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस पथके घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताच्या चौकशीसाठी एक विशेष पथक तयार केले आहे. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर बसवलेल्या वीज मीटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी दिली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, अनेक लोक जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या छतावरून आणि खिडक्यांमधून उड्या मारताना दिसले. केंद्रीय मंत्री आणि बंगाल भाजप अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, मी राज्य प्रशासनाला बाधित लोकांना तत्काळ वाचविण्याची आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची विनंती करतो. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षेचे कडक नियम बनवावेत.