‘कोकणाला Education Hub बनवणार’ : उदय सामंत

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन –  समुद्रकिनारा ही जशी कोकणाची ओळख आहे तसंच एज्युकेशन हब ही कोकणाची ओळख व्हावी या दृष्टीनं आपण काम सुरू केलं आहे. त्याचा एक भाग म्हणून नागपूरच्या संस्कृत विद्यापीठाचं आणि नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं केंद्र येत्या जूनपासून रत्नागिरीत सुरू होत आहे. सिंधुदुर्गात आयुर्वेदीक संशोधन केंद्र सुरू होत आहे. 25 कोटी रुपये खर्चून रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतन अद्ययावत केलं जाणार आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी रत्नागिरी दौऱ्यासंदर्भात भाष्य केलं. यावेळी बोलताना सामंत म्हणाले, नागपूरच्या रामटेक येथील कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची चार उपकेंद्रे राज्यात सुरू करण्यावर आधीपासून चर्चा होती. मात्र त्यात कोणताही निर्णय झाला नव्हता. आता रत्नागिरी, पुणे, औरंगाबाद आणि नांदेड अशा चार ठिकाणी या विश्वविद्यालयाची उपकेंद्रे होणार आहेत. त्यातील रत्नागिरीचं उपकेंद्र येत्या जून महिन्यापासून सुरू होणार आहे. या उपकेंद्रासाठी बस आगारासमोरील इमारतीत 20 हजार चौरस फूट जागा देण्यात आली आहे. या विद्यापीठाचं पहिलं उपकेंद्र रत्नागिरीत होत आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

पुढं बोलताना ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची केंद्रे या ना त्या महाविद्यालयाच्या समन्वयानं सुरू आहेत. मात्र आता त्यांना आयटीआयनजीक दोन एकर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तेथे हे केंद्र होईल. भारतीय प्रशासनिक सेवेचे (आयएएस) स्पर्धा परीक्षा केंद्रही रत्नागिरीत होत असून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्या उपकेंद्रातच लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र होणार असून त्यासाठी 50 लाखांची तरतूद सरकारनं केली आहे.

सामंत म्हणाले, सागरी विद्यापीठात द्विसदस्यीय समिती अभ्यास करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आडाळे औद्योगिक वसाहतीत 50 एकर क्षेत्रांवर देशातील पहिलं आयुर्वेदीक संशोधन केंद्र सुरू केलं जाणार आहे. एकूणच कोकण यातून एज्युकेशन हब होईल असंही त्यांनी सांगितलं.