धक्कादायक ! आईसमोरच चिमुकल्यांचा जातोय जीव, 72 तासांत 102 मुलांचा मृत्यू , काय आहे प्रकरण ? जाणून घ्या

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील कोटा शहरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये अज्ञात तापानं लहान मुलांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 72 तासांत जवळपास 102 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मुख्य बाब म्हणजे या तापाचं नेमकं कारणही समोर आलेलं नााही. या आजाराचंही कोणतं निदान झालं नसल्याचं समजत आहे.

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधूनही अशीच घटना समोर आली होती. त्यात जवळपास 100 मुलांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशच नाही तर बिहारसह काही राज्यांमध्ये दरवर्षी अशा घटना घडताना दिसतात. असे असतानाही राज्य किंवा केंद्र सरकारला यावर अजून कोणताही तोडगा काढता आलेला नाही.

काही मुलांना सुरुवातीला ताप येतो आणि काही दिवसांमध्येच तो गंभीर रुप घेतो. मुलांची प्रतिकारशक्ती झपाट्यानं कमी होते आणि एक एक अवयव काम करणं बंद करतो. हा ताप मेंदूपर्यंत जात असल्यानं मुलांची प्रकृती लगेच खालावते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. धक्कादायक बाब अशी की, मुलांसोबत आलेल्या मातांना आपल्या मुलांचा मृत्यू डोळ्यांसमोर पहावा लागत आहे. कोटमधल्या जे के लोन या एकाच रुग्णालयात जवळपास 11 मुलांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे.

दरम्यान केंद्र सरकारनं या प्रकरणाची दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहत केंद्राकडून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. असे असले तरी यावरून आता राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर भाजपनं राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. गोरखपूरला अशी घटना समोर आल्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांनी त्याचं राजकारण केलं होतं. आता ते का गप्प आहेत असा सवाल भाजपनं केला आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/