धक्कादायक ! सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापिकेची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीरामपूर नगरपालिका गोंधवणी शाळा क्रमांक ३ च्या प्रभारी मुख्याध्यापिका अलकनंदा कारभारी सोनवणे (वय ५० वर्षे, सध्या रा. इंदिरानगर,शिरसगाव, ता.श्रीरामपूर) यांनी राहत्या घरात पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. सहकाऱ्यांच्या त्रासास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गोंधवणी शाळेतील शिक्षिका श्रीमती सोनवणे यांच्याकडे मुख्याध्यापिकेचा कार्यभार होता. अलकनंदा सोनवणे यांनी पतीशी घटस्फोट घेतल्यावर २० वर्षापासून त्या आपल्या आईवडिलासोबत इंदिरानगर येथे राहत होत्या. काल दुपारी घरातील सर्वजण घरासमोर दळण करीत असताना अलकनंदा घरात गेल्या व साडीने गळफास
घेतला. बराच वेळ अलकनंदा घरातून बाहेर येत नसल्याने आई-वडील घरात गेले असता गळफास घेतल्याचे पहिले.

रात्री ९-३० दरम्यान पोस्टमार्टम करून इंदिरानगर येथे मृतदेह आणला. नातेवाईक आल्यावर रात्री १० वाजता अंत्यविधी वडाळा महादेव येथे करण्यात आला.

मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

आत्महत्यास्थळी एक आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिट्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यात दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख असल्याचे समजते. शालेय पोषण आहार संदर्भात अथवा इतर बाबींमुळे सहकाच्याकडून वारंवार त्रास होत असल्याची चर्चा सुरु आहे.