पाईपलाईन लिकेज आणि महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा 16 गावांच्या पाणी योजनेला फटका

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – धरण उशाशी कोरड घशाशी अशी अवस्था सध्या लासलगाव सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेची झाल्याने वीज वितरण कंपनी कडून सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी असूनही या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसापासून पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पालकमंत्री नामदार भुजबळ यांच्या मतदार संघातील लासलगाव या मोठ्या गावी वीज वितरण कंपनीच्या कृपेमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाईप लाईन लिकेज आणि वीज पुरवठा अभावी समस्त लासलगावातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर – मध्यमेश्वर येथे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून एक्सप्रेस फिडर बसवले असून तरीदेखील दिवसातून अनेक वेळा सदर लाईन ट्रीप होत असल्याने लासलगावला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. या योजनेला एक्सप्रेस फिडर बसवले असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे कोणतीही कारण नसते पण वीज वितरण अधिकारी वारंवार वीज पुरवठा खंडित करतात त्यामुळे संपूर्ण योजनेचे पाणी पुरवठा विस्कळीत होतो. यासंदर्भात निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांच्याशी पाणीटंचाई बद्दल चर्चा केली असता त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांची यासंदर्भात त्वरित मीटिंग बोलावण्याचे आश्वासन दिले.

सध्या संपूर्ण देशात करोनाची भयानक स्थिती असताना पाण्याचा मुबलक वापर मोठ्या प्रमाणात होत असताना वीज वितरण कंपनीच्या कृपेमुळे लासलगाव करांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांचे स्वीय सचिव बाळासाहेब लोखंडे साहेब यांच्याशी भीषण पाणी टंचाई संदर्भात पत्रकारांनी माहिती दिली असता दोन दिवसात भुजबळ यांचे बरोबर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.