वाढीव वीजबिल कमी करून सवलत द्यावी मनसेची मागणी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेली तीन महिने वीज बिल आकारणी थांबवण्यात आली होती. आता मोठ्या प्रमाणात वीजबिल आकारण्यात येत आहेत त्यामुळे ही वाढीव वीज बिले कमी करून ही वीज बिले भरण्यास नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख बालेश जाधव यांनी केली आहे.याबाबत चे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना मनसे च्या वतीने देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की लॉकडाऊन शिथिल करून १५ दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे सगळीकडे पैसेच पैसे झाले असल्याचा समज होऊन वीज बिल यायला सुरवात झाली आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने वीज बिल आकारणी करण्यात आली आहे. ही वीज बिले पाहून एखादा सर्वसामान्य नागरिक हृदयविकाराच्या झटक्याने जीव सोडेल इतकी भरमसाठ हे बिल आहेत असा आरोप बालेश जाधव यांनी या वेळी केला.

कोरोनामुळे सामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असताना मात्र नागरिकांना आता महावितरणने वाढीव वीज बिलांचा करंट दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी वीज बिल देणाऱ्या महावितरणने ग्राहकांना अचानक भरमसाट बिल पाठवले असून महावितरण कंपनी ने या बाबत योग्य तो खुलासा करून नागरिकांचे वीज बिलाची रक्कम कमी करून ही बिले भरण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी मनसे च्या वतीने या वेळी करण्यात आली.या वेळी मनसे चे उपजिल्हाप्रमुख बालेश जाधव,आशुतोष सूर्यवंशी,अमित गंभीरे,राम शिंदे,कृष्णा हिरे,योगेश बोराडे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.