मतदार नाव नोंदणीसाठी अखरेची संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदार नाव नोंदणीची अंतिम संधी ३० मार्च २०१९ पर्यंत आहे. यामध्ये मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मतदार संघांबरोबरच राज्यातील इतर अकरा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून ज्या नागरिकांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदवलेले नाही त्यांना ते नोंदविण्याची अखेरची संधी मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. चौथ्या टप्प्यातील अधिसूचना २ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल आहे. या टप्प्यात मुंबईमधील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी या मतदारसंघातील मतदानाचा समावेश आहे.

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी दहा दिवस अगोदरपर्यंत नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी करता येते. त्यानुसार चौथ्या टप्प्यातील मतदार संघातील नागरिकांना यादीत नाव नोंदणीसाठी ३० मार्च ही अंतिम तारीख आहे. मतदार छायाचित्र ओळखपत्र असले तरी मतदान करण्यासाठी मतदान यादीत नाव असणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी. तसेच १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घ्यावी.

चौथ्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या मतदारसंघातील मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करण्यासाठी ३० मार्च पर्यंत www.nvsp.in किंवा संबंधित जिल्ह्यातील निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात नमुना क्र. ६ भरून द्यावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.