नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने नव्या प्रकारची आर्थिक फसवणुक होण्याची धोक्याची सूचना बँकांना दिली आहे. तसेच यूपीआयच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे काढले जाऊ शकतात, अशी भीती रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे.
अशी होऊ शकते फसवणूक –
यूपीआय किंवा वॉलेटसारख्या पेमेंटशी संबंधित कोणत्याही मोबाइल बँकिंग ॲपद्वारेही आर्थिक फसवणूक केली जात असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. आर्थिक घोटाळेबाज ग्राहकांना AnyDesk हे ॲप पाठवतात आणि डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर हॅकर्स मोबाइलवर आलेल्या नऊ डिजिटच्या कोडद्वारे पीडिताचा फोन रिमोटवर घेतात. या ॲप कोडला मोबाइलमध्ये टाकताच, हॅकर्सकडून ग्राहकांना काही परवानग्या मागितल्या जातात. अशा प्रकारे ग्राहकांच्या मोबाइल फोनची माहिती मिळवून त्यांच्या अकाऊंटमधून रक्कम काढली जाते.
यूपीआय किंवा ई वॉलेटसारख्या पेमेंटशी संबंधित मोबाइल बँकिंग ॲपच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शनसाठी होऊ शकतो.या फसवणुकीवर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय बँकेने सर्व कमर्शिअल बँकांना दक्षतेचा इशारा जारी केला आहे. बँक खात्यात ठेवणाऱ्या अनेक ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्यानेच बँकांनी हा इशारा दिल्याचं तज्ज्ञांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला सांगितलं.