लग्नाला निघालेल्या कारचा भिषण अपघात, ५ ठार २ जखमी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर -मुरुड अकोला महामार्गावर कारचा भिषण अपघात झाला असून यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास लातूरजवळ झाला.

परमेश्वर ज्योतीबा अंबीरकर (वय 21) ज्ञानेश्वर बब्रुवान खंदारे (वय 26), जगन्नाथ चंद्रकांत पवार (वय 30, तिघेही राहणार डिकसळ ता. कळंब) गणेश सोमासे (वय 32) आणि नाना शिंदे अशी मृतांची नावे आहेत. तर, दत्ता अंगद जाधव (वय 28), श्रीकांत हणमंत अंबीटवार (वय 28)अशी जखमींची नावे आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालूक्यातील मौजे डिकसळ येथील सातजण आज लातूर शहराजवळील १२ नंबर पाटीवर येत होते. हे सर्वजण मारुती इर्टिगा (क्रमांक एम एच 05 बीजे 0680) कारने लातूरला विवाहासाठी जात होते. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अनियंत्रीत झालेली कार मुरुड अकोला पाटीजवळ असणाऱ्या पुलावरून खाली कोसळली. १५ फूट उंचावरून कार खाली पडल्याने कारचा चक्काचूर झाला. या अपघातात घटनास्थळी पाचजणांचा मृत्यू झाला. जखमींवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.