आदेश येईना… लातुर काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ काही फुटेना…

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) – लातूर जिल्ह्यातील मतदार हा वेळोवेळी काँग्रेसच्या मागे उभा राहिला आहे. मात्र, मागील टर्मला मोदी लाटेचा परिणाम दिसला आणि या ठिकाणी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांनी या मतदार संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र, आता ही जागा राखीव असल्यानं जो उमेदवार येतो त्याचा निर्णय हा पक्षातील इतर जे नेते आहेत त्यांच्यावर अवलंबून असतो असं दिसत आहे.

मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे. मात्र, अद्याप तरी काँग्रेसला प्रचार मुहूर्त मिळत नाही. त्यांनी हार स्वीकारली असल्याच्या चर्चा भाजपच्या गोठात सुरू आहेत. काँग्रेस बॅकफूटवर असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं होतं. मात्र, काँग्रेस फ्रंटफुटला खेळायला कधी सुरू करणार हे अद्याप तरी दिसत नाही. तर काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष श्रेष्टींच्या आदेशाची वाट पहात आहेत. अद्यापपर्यंत निलंगा वगळता कुठलाही बुथमेळावा झाला नाही. त्यामुळे काँग्रेसला उमेदवार जाहीर करायला जसा वेळ लागला तसा वेळ प्रचाराचा नारळ फुटायला लागत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मुख्य गोठ्यात नेमकं काय चालले आहे याची कल्पना कुठल्याही कार्यकर्त्यांना देखील नाही.

दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली मात्र, त्यात उमेदवाराच्या परीचयाखेरीज, हा सामना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होईल असं आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं. मात्र, आद्यप तरी जनशक्ती एकत्र येऊन प्रचाराचा नारळ फोडू शकली नाही. काँग्रेसचा प्रचार नारळ कधी फुटेल माहिती नाही. मात्र, जो उशीर प्रचार सुरू करण्यात होत आहे. त्याचा परिणाम मात्र, उमेदवाराला होईल असं हे निश्चित. उमेदवार प्रचाराला लागले आहेत. बाकी बैठका सुरू आहेत. दोन दिवसांनी प्रचार सुरू होईल, असं मत शहर जिल्हाध्यक्ष मोईज भाई शेख यांनी व्यक्त केलं. त्यामुळं देशभरात प्रचार सुरू असला तरी लातुरात मात्र काँग्रेसच्या गोठात स्मशान शांतता दिसत आहे.