नाशिक ते हैद्राबाद, बेंगलुरू, दिल्ली विमान सेवेला सुरूवात

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – अनेक दिवसांपासून असलेले नाशिककरांचे स्वप्न आज काही अंशी पुर्ण झाले. शनिवारी स्पाईस जेट कंपनीने ओझर विमानतळावरून हैद्राबाद, बेंगलुरु व दिल्ली या महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या सेवेला प्रारंभ केला. पहिल्याचं दिवशी ८० टक्के बुकींग झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

ओझर विमानतळावर एका कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ यांनी या सेवेला झेंडा दाखविला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, प्रांताधिकारी संदीप आहेर, मिग कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. वी. शेषगिरी राव, एचएएलचे जनरल मॅनेजर दीपक सिंगल, साकेत चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एचएएलच्या विमानतळावर सुमारे ६५ कोटी रुपये खर्च करून एअर टर्मिनलची उभारणी केली होती. सुरुवातीला डेक्कन कंपनीने नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे हवाई सेवा सुरु केली परंतू त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दिल्ली- नाशिक सेवाही सुरु केली तीही कालांतराने बंद झाली.वर्षभरापासून अलायन्स एअर कंपनी मार्फत नाशिक ते अहमदाबाद, हैद्राबाद व दिल्ली हि सेवा तसेच ट्र् जेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद हि सेवा लॉकडाऊनचा काळ वगळता निरंतर सुरु आहे. त्यात आता स्पाईस जेट कंपनीच्या सेवेची भर पडली.

अशी असेल वेळ
नाशिक येथून महत्त्वाच्या शहरांसाठी हवाई सेवेला सुरुवात झाली आहे. साधारण तीन ते चार हजार रुपये हवाई सेवेचे दर राहतील. हैद्राबाद येथून सकाळी १०.३५ वाजता नाशिककडे उड्डाण होईल. दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी ओझर विमानतळावर पोहोचेल. ओझरहून दुपारी १२.३५ वाजता हैद्राबादकडे उड्डाण झाल्यानंतर दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. बेंगलुरु वरून सकाळी ११.२० वाजता ओझरकडे उड्डाण होईल. दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. नाशिक हून १२.५५ वाजता बेंगलुरु कडे उड्डाण होईल. दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. २५ नोव्हेंबर पासून दिल्ली सेवा सुरु होईल. दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी ओझरकडे उड्डाण होईल. संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. संध्याकाळी पाच वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीकडे उड्डाण होईल. सात वाजून २५ मिनिटांनी दिल्लीत पोहोचेल.

विमानसेवा निरंतर सुरु रहाणे आवश्यक
देशातील महत्वपूर्ण असलेली बेंगलुरु, हैदराबाद व राजधानी दिल्ली हि शहरे नाशिकला हवाई सेवेने जोडली गेल्याने आनंद आहे. या माध्यमातून उद्योग, व्यवसाय व पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल. विमानसेवेमुळे शेती उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. यासाठी विमानसेवा निरंतर सुरु राहणे आवशक्य आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले

पाठपुराव्याला यश
नाशिक देशातील प्रमुख शहराशी जोडले गेल्याने कनेक्टिव्हिटी बळकट होणार आहे. विमानसेवा सुरु करण्याच्या प्रयत्नांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान आहे.
हेमंत गोडसे, खासदार