वीज पडून १ हजार गोणी कांदा भस्मसात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुक्यातील बोरी येथील विठ्ठल मोरे, पंढरीनाथ मोरे यांच्या कांदा वखारीवर वीज पडून सुमारे एक हजार कांदा गोण्या जळून खाक झाला. यात संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

अवकाळी पावसामुळे मोसमी पाऊस लांबणीवर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्याचा होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जीवित हानी झालेली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी वीज पडून कांद्याच्या वाखारीने पेट घेतला. या आगीत १ हजार गोणी कांदा जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.