मनसे देणार Facebook Live च्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत लॉकडाऊनचे संकेत दिले. मात्र, या निर्णयाविरुद्ध अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपसह व्यापाऱ्यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. विरोध करण्यामध्ये काही बडे उद्योजकांचाही समावेश आहे. या सर्वांचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेत जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला.

अर्थमंत्र्यांपासून ते उद्योजक आनंद महिंद्रांनाही त्यांनी लक्ष्य केलं. विशेष म्हणजे मास्क न वापरण्यात कसलं शौर्य? असे म्हणत नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. आता मनसेनेही लाइव्हच्या माध्यमातून देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाइव्हची मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे. ट्विट करून देशपांडे म्हणतात की, मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच ! आज सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्ह. असे ट्विट देशपांडे यांनी केलंय.

काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अनेकजणांना असं वाटतंय, आपण मास्क का लावतोय, पण मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, रशिया मधल्या परिस्थितीची माहिती देत तिथं अजुनही कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन आहेत. मात्र आपल्या राज्यात जनतेचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन लॉकडाऊन केलेला नाही. त्यामुळे कोरोनाचं विरोधकांनी राजकारण करू नये. उलट राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांसाठी त्यांनी मदत करण्याची भूमिका घ्यावी असं आवाहन त्यांनी केले.

लॉकडाऊन नको मग पर्याय सुचवा
कोरोनाच्या चाचण्या महाराष्ट्रात सर्वाधिक होत आहेत. अजूनही यामध्ये वाढ करण्यात येत आहे. आरोग्य सुविधा वाढवत आहोत. पण आरोग्य सुविधा वाढवा म्हणजे फक्त फर्निचर वाढवून चालत नाही. त्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्सेस आणि तज्ज्ञ मंडळी कुठून आणणार?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित करत संपूर्ण लॉकडाऊन इशारा त्यांनी दिला. राज्यात नव्या निर्बंधांची नियमावली दोन दिवसात जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याचा रुग्णवाढीचा वेग असाच राहिला तर उपलब्ध आरोग्य साधने अपुरी पडतील आणि त्यावेळी मग कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराहि मुख्यमंत्र्यांनी दिला.

लॉकडाऊनबाबत काँग्रेसची भूमिका
लॉकडाऊनच्या निर्णयाविरुद्ध अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसनेहि आपली भूमिका जाहीर केली असून पुन्हा एकदा सरसकट लॉकडाऊन परवडणारा नसल्याचे म्हंटले आहे. काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यासंदर्भात बोलताना म्हणाले की, वाढत्या रुग्ण संख्येची चिंता सर्वानाच आहे. स्वाभाविकपणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनाही ती चिंता आहे. परंतु आम्ही लॉकडाऊनबाबत आमची याआधीही भूमिका स्पष्ट केलेली आहे. संपूर्ण लॉक डाऊन करणे योग्य नाही. आता जो नाईट कर्फ्यू आहे त्यामध्येच अधिक काही करता येते का पाहणे आवश्यक आहे असे भाई जगताप म्हणाले.