मतदान केल्यानंतर डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २४ मार्चला निवणूका होणार आहेत. या निवडणुकीत मतदरांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मतदरांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या शाईने निशाणी केली जाते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार राज्यामध्ये ११, १८, २३ ते २९ एप्रिल अशा चार टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी साधारणत: एकाच वेळी मतदान होत असल्याने शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई न लावता उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने २४ मार्च रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, सरपंचांच्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुका, विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुका आणि नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याचा निर्णय घेतला आहे.