पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी नसून व्यापक लोकहित लक्षात घेऊनच, अजित पवार यांचे स्पष्टीकरण

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या लॉकडाऊन संदर्भात आपण घेतलेला निर्णय हा एकतर्फी नसून तर व्यापक लोकहित आणि प्रशासनाकडून आलेल्या माहिती तसेच सूचनांचा विचार करुनच घेतला आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

पुणे शहरसह परिसरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत दोन्ही शहरांमध्ये असणार आहे. मात्र, या निर्णयामुळे पुणेकर नाराज झालेत. तसेच या निर्णयाला व्यापारी संघानेही जोरदार विरोध केला आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्याच्या लॉकडाऊन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याची टीका केली होती. एकाही आमदार, खासदाराला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे बापट म्हणाले होते. त्यावर अजित पवार यांनी बारामतीमध्ये हा खुलासा केला आहे.

लॉकडाऊनचा निर्णय घेताना पुणे शहराची सध्याची परिस्थिती, कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या, नागरीकांचे स्वयंशिस्तीचे पालन न करणे तसेच प्रशासनाकडूनही ज्या सूचना आल्या होत्या, त्याचा व्यापक विचार केला आहे. हा निर्णय कोरोनावर मात करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. त्यामुळे यात एकतर्फी असायचे काही कारण नाही, असेही अजित पवार सांगितले आहे.

या संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनाही याची कल्पना होती. फोनवरुन जे लोकप्रतिनिधी उपलब्ध झाले त्यांनाही याची कल्पना दिली होती. लॉकडाऊनच्या संदर्भात पुण्याच्या महापौर यांना माहिती दिली होती.

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची शासनास गरज आहे. राज्य शासन म्हणून आम्हीही सर्व बाजूंचाच विचार नेहमी करतो. मात्र, हे करताना व्यापक जनहिताला प्राधान्य द्यावे लागते, प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात.

केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे त्याचा अवलंब भारतातही अनेक राज्ये करीत आहेत. आर्थिक स्तरावर अनेकांचे नुकसान होत आहे, याची जाणीव आहे. मात्र, तरीही लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.