Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने 15 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. या कालावधीत रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, दैनंदिन रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळपास आढळून येत आहे. त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील लॉकडाऊन वाढण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली. याबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलचा आदेश काढण्यात आला आहे. 31 मे पर्यंत कठोर निर्बंध वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता यामध्ये आणखी एका दिवसाची भर पडली आहे.

या कालावधीत दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. तसेच घरपोच सेवा विक्रीसाठी देखील परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच इतर राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी 48 तास आधी कोरोनाची आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट आवश्यक करण्यात आली आहे. परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास करण्याची परवानगी असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.

काय सुरु काय बंद ?
1.
किराणा दुकाने – सकाळी 7 ते 11
2. भाजीपाला विक्री – सकाळी 7 ते 11
3. दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री – सकाळी 7 ते 11
4. फळे विक्री – सकाळी 7 ते 11
5. कृषी संबंधित सर्व सेवा/दुकाने – सकाळी 7 ते 11
6. अंडी, मटण, चिकन, मासे, विक्री – सकाळी 7 ते 11
7. पशूखाद्य विक्री – सकाळी 7 ते 11
8. बेकरी मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने – – सकाळी 7 ते 11
9. पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने – सकाळी 7 ते 11
10. येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने – सकाळी 7 ते 11

लॉकडाऊन लागू केल्याने मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरात कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आणि रुग्णपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषणूची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.