राज्यात Lockdown की कडक निर्बंध? मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 25 हजाराच्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार असून पुढील कालावधीमध्ये काही कठोर निर्णय घेतले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात या जिल्ह्यात लॉकडाऊन

राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे नांदेड, अमरावती, नागपूर, अकोला येथे स्थानिक पातळीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील इतर शहरी भागात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. खासकरुन मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरामध्ये दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. मुंबईत तीन हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच राज्यात मंगळवारी 28 हजार 699 रुग्ण आढळून आले. तर 132 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज दुपारी होणारी मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

आरोग्यमंत्र्यांचे पुण्यात लॉकडाऊनचे संकेत

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे जिल्ह्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी कदाचित महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये वाढती रुग्ण संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेट बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढील काळात काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषत:  शहरी आणि ग्रामिण भागात ज्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे. त्या भागात कंटेनमेंट झोन किंवा कठोर निर्बंध लावण्याची शक्यता आहे.

राज्यात जम्बो सेंटर पुन्हा सुरु

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील जम्बो सेंटर पुन्हा सुरु करण्यास सांगितले  आहे. कॉन्टॅक्ट, कनेक्ट आणि ट्रेसिंग यावर राज्य सरकार भर देत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. ज्या भागामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशा भागात कदाचित कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.