प्रचारबंदीची कारवाई संपताच मायावतींनी निवडणूक आयोगावर केले ‘हे’ गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारबंदीचे उल्लघंन करत आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई का केली नाही. असा सवाल बसपा नेत्या मायावती यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या प्रचारबंदीवरील कारवाई संपल्यानंतर मायावती यांनी निवडणूक आयोगावर ट्विटरवरुन टीका केली आहे.

लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरु आहे. देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. याचदरम्यान, निवडणूक आयोगाच्या प्रचारबंदीचे उल्लंघन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शहरात, मंदिरांत आणि दलितांच्या घराबाहेर जाऊन जेवण करण्याचे नाटक करत आहेत. त्याचे प्रसारण मीडियामध्ये करुन निवडणूकीत लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्यावर निवडणूक आयोग दया का दाखवत आहे? असा सवाल बसपा नेत्या मायावती यांनी केला आहे. याचकबरोबर जर असा भेदभाव आणि भाजपा नेत्यांच्या बाबतीत निवडणूक आयोग कानाडोळा करत असेल तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष होण्याची शक्यता कठिण आहे. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तासांची तर बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी लागू केली होती. याचदरम्यान निवडणूक आयोगाने केलेल्या प्रचारबंदीवरील कारवाई संपताच मायावती यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.