‘९ कोटी शौचालयं, सव्वा कोटी घरं अंबानी-अदानींसाठी बांधली नाहीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम्ही अडीच कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचवली. ९ कोटी शौचालयं आणि सव्वा कोटी घरं अंबानी-अदानींसाठी बांधली नाहीत असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका करणाऱ्यांना विरोधकांना दिले आहे. मोदी सरकार अंबानी-अदानींसाठी काम करते असा आरोप विरोधकांकडून केला जातो. मोदींना त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, “मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढल्याचा दाखला दिला जातो. वाजपेयींच्या काळातही असे चुकीचे आरोप केले जात. मात्र, नंतरच्या अहवालात सर्वाधिक रोजगार त्या काळात निर्माण झाल्याचे समोर आल्यानंतर सगळे गप्प बसले. आज रस्ते बनत आहे. ऊर्जा क्षेत्रात मोठे काम होत आहेत. तिथे लोक काम करत आहेतच ना, मग त्यांना रोजगार मिळाला नाही का ? असा उलट सवालही त्यांनी विचारला.

यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “काँग्रेसला वढेरा-गांधी कुटुंबाविरोधातील खटले दाबायचे होते. ते स्वत:ला राजे-महाराजे समजत होते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. गांधी कुटुंबीय आता कधीच सत्तेवर येणार नाही” असे भाकीत त्यांनी यावेळी वर्तवले.

काँग्रेसवर टीकेची झोड उठवताना मोदी म्हणाले की, “एकाच कुटुंबातील चार पिढ्या गरिबीवर चर्चा करत आल्या आहेत. याच लोकांनी ५५ वर्षे देशावर राज्य केले. आज पुन्हा ते गरिबीवर बोलत आहेत. त्यांनी आता गरिबांसाठीची योजना जाहीर केली आहे. त्यांचे सरकार येणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच ते असे बोलत आहेत.” असेही मोदी म्हणाले.