गडी भारी ए…! पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो : शरद पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – एके दिवशी मोदी कुठंतरी म्हणाले, शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो. ‘काय गडी भारी ए.., पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो,’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पवारांनी टोला हाणला. अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार शेवगाव येथील आयोजित सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आतापर्यंत गांधी घराण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिव्या घातल्या आता आमच्या कुटुंबावर बोलत आहेत. आमच्या घरात भांडणे आहेत असे मोदी सांगतात अरे स्वत:ला घर नसलेले आमच्या घरात डोकावतात’. अशी टीका शरद पवार यांनी यावेळी बोलताना केली. राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी ही बाई देश सोडून जाईल असे लोक म्हणत होते. मात्र सोनिया गांधी उभ्या राहिल्या. देशासाठी योगदान दिले. तरीही नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीका करत आहेत.

शेजारील राज्य आहे म्हणून मदत केली. मी शेतीमालाला भाव वाढविण्याची भूमिका पार्लमेंटमध्ये मांडली होती. त्यानंतर प्रधानमंत्री मला आल्यावर मागणी योग्य नसल्याचे बोलले. सरकारचे धोरण स्वत: ला प्रसिद्धी करण्याचे आहे. पाच वर्षात २४५ कोटी जाहिरातींवर खर्च केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५ महिन्यांमध्ये ९२ वेळा परदेशात गेले. या दौऱ्यासाठी दोन हजार कोटी खर्च केला. काळा पैसा आणण्याचे सांगितले. लोकं वेडी झाली. स्वित्झर्लंडला गेले. सर्वांना भेटले. हात हालवत माघारी आले. आणि सांगायचं काय हा प्रश्न होता. रात्रीच नोटाबंदी केली. अख्खा देश रांगेत उभा राहिला.