राजकीय नाट्य : जळगावचा भाजप उमेदवार बदलाची शक्यता

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी निश्चित केली आहे. परंतु, सध्या स्मिता वाघ यांच्या नावाचा भाजपमध्ये फेरविचार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आज स्मिता वाघ उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

जळगावमधील स्थानिक शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये असणाऱ्या कळीच्या मुद्द्यमुळे स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये ही युतीमध्ये शीत युद्ध असल्याचे पाहण्यास मिळते आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेने ‘एकच स्पीरीट नो किरीट’ हा नारा दिला आहे. याच बरोबर किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी निवडणूक लढण्याचा इरादा पक्का केला आहे. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपला आपला उमेदवार शिवसेनेच्या मर्जीने द्यावा लागणार आहे.

दोन वेळा खासदार राहिलेल्या ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. स्मिता वाघ या विधान परिषदेच्या सद्स्या असून त्यांच्या विधिमंडळातील कामगिरीवरच त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या तिकिटाला आता ग्रहण लागण्याची शक्यता आहे.