निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले : ममता बॅनजी

बंगालमध्ये दंगली घडविणे हा भाजपचा अजेंडा

 वृत्तसंस्था –  ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप बरोबरच निवणूक आयोगावर देखील हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले असून आयोग भाजपसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पश्चिम बंगाल मधील प्रचार उद्या रात्री दहा वाजता बंद करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ममतांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

ममता म्हणाल्या कि, ‘निवडणूक आयोगाचा निर्णय हा अनैतिक तसेच भाजपच्या बाजूने घेतला आहे. नरेंद्र मोदी यांना उद्याच्या दोन रॅली पूर्ण करण्यासाठी आयोगाने वेळ दिला आहे. नरेंद्र मोदींना उद्याच्या प्रचारासाठी वेळ मिळावा या हेतूने हा निर्णय घेतला आहे’.

भाजपवर हल्ला चढवताना त्या म्हणाल्या कि, गोंधळाची परिस्थीती निर्माण करण्यासाठी भाजप बाहेरील शक्तींचा वापर करत आहे . मंगळवारी झालेल्या हिंसाचाराला भाजपचे गुंडेच जबाबदार आहेत. बंगालमध्ये दंगली घडविणे हाच भाजपचा अजेंडा आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेत भाजप हस्तक्षेप कसा करू शकते?