‘मतदारांनो माझ्या भावाची काळजी घ्या’ : प्रियंका गांधींची भावनिक साद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मतदारांनो माझ्या भावाची काळजी घ्या, तो खूप धाडसी आहे, तुमची नक्कीच काळजी घेईल असं भावनिक आवाहन काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी मतदारांना उद्देशून केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांचा रोड शो झाला. यानंतर प्रियंका गांधी यांनी मतदारांना साद घालत भावनिक आवाहन केले.

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, “माझा भाऊ माझा खरा मित्र आहे. आतापर्यंत ज्यांना भेटलो त्यात माझा भाऊ हा खूप साहसी आहे. वायनाडकरांनो काळजी घ्या. तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही.” दरम्यान वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत काँग्रेसने दक्षिण भारतातल्या लोकांना आपलसं करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केराळातील वायनाड असे हे दोन मतदारसंघ आहेत.

वायनाड लोकसभा मतदारसंघ कर्नाटक आणि तमिळनाडून राज्यांच्या सीमांना लागून आहे. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार आहे. दुसरीकडे तमिळनाडूमध्ये काँग्रेस डीएमकेबरोबर निवडणुकीच्या रिंगणात आहे. काँग्रेसच्या या दोन मित्र पक्षाच्या जोरावर काँग्रेस सत्तेत परत येऊ शकते अशी आशा व्यक्त होताना दिसत आहे.