शेण घोटाळा करणारे ‘हे’ शेतकऱ्यांना कसा न्याय देतील ? उद्धव ठाकरेंचा घणाघात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमरावतीत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना “आघाडी सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांनी गुरांचे शेण सुद्धा विकून खाल्ले होते. शेण घोटाळा करणारे हे शेतकऱ्यांना कसा न्याय देतील ? असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर तोफ डागली”. आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतली.

निवडणुकीच्या तोंडावर यांना दुष्काळ आठवला यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘परभणी येथे प्रचाराला जाताना एका वृत्तपत्रात शरद पवार यांचा चारा छावणीला भेट देतानाचा फोटो पाहिला. यांना चार वर्षांनंतर शेतकरी, दुष्काळ आठवला? गेल्या चार वर्षात जणू महाराष्ट्रात शेतकरी नव्हताच आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी महाराष्ट्रात आला आहे. गेले दोन-पाच वर्ष महाराष्ट्रात सगळं आबादी आबाद होतं, महाराष्ट्रात दुष्काळ नव्हताच. आता निवडणुकीच्या तोंडावर जणू दुष्काळ आला आहे, असेच हे दाखवता आहे, अशा खरपूस शब्दात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

दुष्काळ असताना मी स्वत: शिवसेनेच्या ६३ आमदार आमदार घेऊन मराठावाड्यात गेलो होतो. शेतकऱ्यांना मदत केली. त्यांच्या समस्या दूर केल्या, हे शिवसेनेने केले, तेव्हा विरोधी पक्ष कुठे दिसले नाहीत याची आठवण त्यांनी करून दिली.