काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी, अशोक चव्हाणांची जाहीर सभेत घोषणा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही लोक पक्षात राहून पक्षविरोधी कामं करत आहेत. जालन्यात एक भूमिका आणि औरंगाबादेत एक भूमिका असे चालणार नाही. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्यातील मतदान झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान राहिलेल्या मतदार संघांमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान जालन्याचे आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भोकरदन येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी जालन्यात उमेदवारी देताना आम्ही त्यांना विश्वासात घेतले होते. तसेच त्यांना स्वतःलाही उमेदवारी देऊ केली होती. मात्र,त्यांनी ती स्वीकारली नाही. असे अशोक चव्हाण यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पक्षात राहून पक्षविरोधी कामं करत आहेत. जालन्यात एक भूमिका आणि औरंगाबादेत एक भूमिका असे चालणार नाही. आता विषय संपला आहे सत्तारांना मी पक्षातून काढतो. असा आक्रमक पवित्राही त्यांनी घेतला.

विशेष म्हणजे, अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज झाले. त्यानंतर त्यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. इतकेच नव्हे तर, काही काळानंतर त्यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तसेच या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना दिला आहे.

मात्र त्यावेळी त्यांनी मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. असे म्हंटले होते. तसेच मी अपक्ष लोकसभा निवडणुक लढणार आहे अशी घोषणाही त्यांनी केली होती.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आणि आता त्यांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी केली आहे. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली आहे.