भाजपने राम मंदिर तर नाही, टोलेजंग कार्यालय मात्र बांधले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोटाबंदीमुळे कोणाचे भले झाले हे आता दिसू लागले आहे. भाजप मतदारांना पैशांचे आमीष दाखवत असल्याच्या बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहेत. भाजपातर्फे संपत्तीचे प्रदर्शनही केले जात आहे. राम मंदिर बाजूला राहिले, मात्र, भाजपचे टोलेजंग कार्यालय बांधले गेले असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, आघाडीचे सरकार यावी अशी जनतेची भावना आहे. त्यामुळे अर्ज भरतानाही लाखो लोकं उपस्थित राहिले. जवान आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. निवडणूक आचारसंहिता भंग केली जातेय. भाजपाच्या मंत्र्यांनी शत्रुराष्ट्राचा सॅटेलाईट पाडला असे विधान केले, त्याबद्दल त्यांच्या कल्पनाशक्तीचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकात पाटील यांना लगावला

इतकेच नव्हे तर, सर्व जनता सरकारवर नाराज आहे, आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मते खाण्यासाठी महाराष्ट्रात एक आघाडी तयार केली आहे असा आरोप जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता केला.

तसेच, फडणवीस सरकारवर टीका करत करतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र सोडले, नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची पातळी सोडली आहे. देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने जोरजोरात भाषणे करुन लोकांशी खोटे बोलतात ते पंतप्रधान पदाला न शोभणारे आहे. आक्रस्ताळेपणा करणारा असा पंतप्रधान कधीच देशाने पाहिला नाही असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, महाआघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसचा रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह होता. त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला आहे. जळगावची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढवेल अशी माहितीही त्यांनी दिली.