नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात प्रवेश करून प्रियांका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना धक्का दिला होता. आता प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवेशाच्या ‘टायमिंग’वर भाष्य केलं आहे. राजकारणात उशिरा प्रवेश करणं हि आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती,असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांनी एका खासगी वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश करण्याची मागणी अनेक वर्ष काँग्रेस कार्यकर्ते करत होते .२०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही प्रियांका गांधींनी नेतृत्व करावं, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना हे शक्य झाले नाही. मात्र प्रियांका यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहुर्त निवडला.