नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी माफी मागतो, त्यांच्या चुका आम्ही दुरुस्त करु

डेहराडून : वृत्तसंस्था – जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. जीएसटीच्या या मोठ्या चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी आपली माफी मागतो. असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. डेहराडूनमध्ये आयोजित जनसभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये काँग्रेसपक्षातार्फे जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेला संबोधतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल डील, जीएसटी आणि किसान सन्मान योजनेवरुन हल्लाबोल केला. दरम्यान, ‘आम्ही गब्बर सिंह टॅक्सला खऱ्या जीएसटीमध्ये बदल करु. ज्यामध्ये एक साधारण टॅक्स असेल. जीएसटी मुळे आपले नुकसान झाले आणि त्यासाठी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मी माफी मागतो. त्यांनी मोठी चूक केली आहे, ती आम्ही दुरुस्त करु. असे त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून संसदेत प्रतिदिन साडे तीन रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भाजपा खासदारांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून टाळ्या वाजवल्या, असेही त्यांनी म्हंटले, तसेच ‘एका चोराला तुम्ही तीस हजार कोटी रुपये देता. मात्र, देशातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही दिवसाला साडे तीन रुपये देता आणि मूर्ख बनवण्यासाठी टाळ्या वाजवता. असा टोलाही त्यांनी लगावला.