मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निडवणुकीत तीन आघाड्याची लढत दिसणार आहे. त्यात चौथी आघाडी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या लढतीत चौथी आघाडी झाली तर त्यात दुग्धविकास विकास आणि पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे असतील अशी चर्चा होती. मात्र या चौथ्या आघाडीत मी नसेल, अशी माहिती स्वतः सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी शिवसेना-भाजपला जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्या अन्यथा आम्हाला चौथी आघाडी करावी लागेल असा इशारा दिला होता. तसंच या आघाडीत सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटनाही सामिल असेल असंही जानकरांनी सांगितलं होते. मात्र त्यावर आम्ही चौथ्या आघाडीत जाणार नाही, मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल, असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. चौथ्या आघाडीत सामील होण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत भाजपसोबतच राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसंच, हातकंणगले मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे. मात्र ही जागा शिवसेनेच्या कोट्यातील आहे. शिवसेना हातकंणगले मतदारसंघ सोडण्यास तयार नाही मात्र आम्ही प्रयत्न करत आहोत. अद्याप शिवसेना नेत्यांशी बोलणं झाले नसलं तरी मुख्यमंत्री या जागेबाबत निर्णय घेतील, असही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, स्वाभिमानीला ३ जागा द्या अन्यथा १५ जागांवर उमेदवार उभे करु. स्वबळावर आगामी लोकसभा निवडणूक लढवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बुलडाणा, वर्धा, औरंगाबाद, लातूर, परभणी, शिर्डी, नाशिक, माढा, धुळे, नंदूरबार, शिरुर या जागांवर ते उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.