..म्हणून आम्ही युती केली ; उद्धव ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने युती केली. मात्र गेली साडेचार वर्ष एकमेकांवर नको तेवढे आरोप करून टीका केल्या. मात्र त्यानंतर सर्व आलबेल करत एकत्र आले. निवडणुकीच्या तोंडावर युती केल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र आम्ही वेगळे लढलो असतो तर कोण किती जिंकलं असतं याच्यापेक्षा कुणाचं किती नुकसान झालं असतं याचा विचार करायला हवा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युतीवरील स्पष्टीकरण दिलं.

ज्याच्यामुळे आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता तो दुरावा दूर करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे तेव्हा आम्ही हिंदुत्वावर युती केली होती. आजही हिंदुत्व हाच युतीचा धागा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. निवडणुका जाहीर होण्याआधी मी एका वेगळ्या भूमिकेत नक्कीच होतो. गेली चार-पाच वर्षं शिवसेना सातत्याने जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडत आहे. राज्यात तर सोडाच, पण संपूर्ण देशात विरोधी पक्ष गलितगात्र होऊन पडले होते आणि जनतेचा आवाज कुणी उठवत नव्हतं, तेव्हा एकटी शिवसेना जनतेचा आवाज बुलंदपणे उठवत होती. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे एकदा नव्हे, तर दोन वेळा मला भेटायला आले. घरी आले आणि जेव्हा युतीचं नक्की ठरलं तेव्हा मी त्यांच्यासमोर जनतेचे प्रश्न मांडले. ते मानले गेले, स्वीकारले गेले आणि त्यावर उपाययोजनासुद्धा सुरू झाली असेल तर मग संघर्ष कशासाठी करायचा ? म्हणून युती केली, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचे प्रश्न होते, नाणारचा मुद्दा होता, राममंदिराचा मुद्दा होता. सगळे मुद्दे आम्हीच मांडले, हिरीरीनं मांडले. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी उचलायला हवे होते ते मी जनतेच्या हितासाठी उचलले. युती झाल्यानंतर आमच्यात थोडा गलथानपणा आला. म्हणून २५ वर्ष युतीत सडली असं वक्तव्य केलं तो जो काही गलथानपणा होता तो आता राहणार नाही, असंही त्यांनी यावेळी नमुद केले.

विचार पोहोचवणं, विचार पसरवणं हा काही गुन्हा नाही. विरोधी पक्षाकडे सत्ता गेली तर पंतप्रधानपदावरुनही त्यांच्यात पुन्हा भांडणं होणार. त्यामुळे आता जर का आपण मागे गेलो तर या देशात हिंदू हा हिंदू म्हणून उभा राहणं कठीण होईल. त्यामुळे हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.