एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल : अरुण जेटली

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. एक्झिट पोल नुसार भाजपा सरकारच पुन्हा बहुमताने येणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बहुतांशी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा सरकार 272 चा बहुमताचा आकडा पार करणार आहे, असे सांगण्यात आले आहे. एक्झिट पोलमध्ये ईव्हीएमचे काही योगदान नसते. निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलप्रमाणेच लागला तर विरोधकांची ईव्हीएमवरील टीका निरर्थक ठरणार असल्याचे जेटली म्हणाले. असे झाले तर मतदार किती परिपक्व आहे हे स्पष्ट होईल. कारण मतदार मत देण्यापूर्वी राष्ट्रीय हिताचा विचार करतात. जेव्हा चांगले विचार करणारे समान विचाराने एकाच दिशेने मतदान करतात तेव्हाच असे होऊ शकते असेही जेटली म्हणाले.

काँग्रेसमधला मोठा परिवार ही ताकद राहिली नसून ओझ बनल्याची टीका जेटली यांनी केली. मतदार आता विरोधकांवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. जातीवर आधारित आघाड्या मतदारांना मान्य नाहीत. तसेच लोक आता खोट्या मुद्द्यांवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत असेही जेटलींनी स्पष्ट केले.