पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा २०१९ च्या १७व्या निवडणुकांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात बदल घडून येणार असे दिसते आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांचा विचार करता कोणत्या मतदार संघात कोण निवडून येणार याचा थोडाफार अंदाज तरी राजकीय विश्लेषकांना आणि नागरिकांना यायचा विश्लेषकांनी लावलेले तर्क वितर्क बरोबर किंवा त्या आसपास निघायचे. मात्र आता यंदाच्या निवडणुकीत नक्की काय होणार याचा अंदाज बंधने कठीण झाले आहे. काही मतदार संघात चुरशीची लढत होईल असे वाटते. मावळा, शिरूर, माढा, सोलापूर अशा मतदार संघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. पण माढा, नांदेड आणि बारामती ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदार संघांना मात्र यंदाच्या निवडणुकीत खिंडार पडणार असे दिसते आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पारंपारिक मतदार संघात जिथे विजय निश्चित मानला जातो तिथे हे तिन्ही मतदार संघ सध्या ‘डेंजर झोन’ मध्ये असल्याचे दिसत आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघ
नांदेड लोकसभा मतदार संघाचा विचार करता २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता पहिल्यापासुनच काँग्रेसचे या मतदार संघात वर्चस्व आहे. या मतदार संघात मागील अनेक काळापासून काँग्रेसचे प्राबल्य आहे. यंदा काँग्रेसचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा-कंधार विधानसभेचे शिवसेनेचे आमदार आहेत. तसे पाहायला गेले तर काँग्रेसच्या अशोक चव्हाणांशी पाटील यांचे सूत गेल्या अनेक वर्षांपासून जुळत नाही. त्यामुळेच भाजपकडून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्याची शिवसेना भाजप युती आणि देशातील मोदी फिव्हर पाहता. पारंपारिक विजय असणाऱ्या काँग्रेसला मात्र यंदा गड राखणे अवघड जाणार आहे हे निश्चित मानले जात आहे.
बारामती लोकसभा मतदार संघ
बारामती लोकसभा मतदार संघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मतदार संघ मानला जातो. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये १६ पैकी १३ वेळा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी बारामतीचा गड जिंकला आहे. इतर तीन निवडणुकांमध्ये आयसीएस (१९८४), बीएलडी (१९७७)आणि जनता पार्टी (१९८५) त्यांचा विजय या मतदार संघात झाला होता. यंदा बारामती मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपकडून पहिल्यांदाच स्थानिक उमेदवार जाहीर करीत कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या मताधिक्यात घट झाल्याचे निदर्शनास आले. सुप्रिया सुळे यांनी केवळ ६९हजार ७१९ मताधिक्य मिळवून यश संपादन केले होते.
यंदाच्या निवडणुकीचा विचार करता भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिल्यामुळे बारामती मतदार संघातील निवडणूक चुरशीची होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दौंडचे माजी आमदार दिवंगत सुभाष कुल हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. कुल यांच्या अकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी रंजना कुल या विजयी झाल्या. २००९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती यावेळी रमेश थोरात यांनी अपक्ष उभे राहून राहुल कुल यांचा पराभव केला होता. हा पराभव राष्ट्रवादीतीलच काही फुटीरवाद्यांमुळे झाल्याचे मत कुल गटाचे होते त्यामुळे २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राहुल कुल यांनी भाजप राष्ट्रीय समाज पक्षाच्या युतीमध्ये रासप कडून उमेदवारी घेत थोरात यांना पराभूत केले होते. हा एक प्रकारे पवार यांच्यासाठी धक्काच होता. राहुल यांच्या पत्नी कांचन यांना उमेदवारी देत भाजपने बारामतीतून पुन्हा पवार कुटुंबासमोर आव्हान उभे केले आहे. तार वंचित बहुजन आघाडीकडून नवनाथ पडळकर यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
माढा लोकसभा मतदार संघ
माढा लोकसभा मतदार संघाची स्थापना २००८ साली करण्यात आली. यापूर्वी २००९ साली झालेल्या निवडणुकीत माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ साली हा विजय कायम ठेवत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली. अवघ्या २५००० मताधिक्याने त्यांचा विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकणांमध्ये सुरुवातीपासूनच या मतदार संघात नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. सुरुवातीला या मतदार संघातून शरद पवार लढणार होते मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर या मतदार संघातून राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी लागणार यासाठी उत्सुकता लागली होती. माढ्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा चालू असताना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मात्र संजय शिंदे यांना देण्यात आली. या मधल्या काळात राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणारे घराणे दुखावले गेले. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंग यांनी भाजपात प्रवेश केला. राष्टवादीला हा मोठा धक्का होता. त्यामुळे या नाराजीचे पडसाद यंदाच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत.
भाजपकडून आधीपासूनच प्रतिष्ठेच्या ठरलेल्या माढा लोकसभा मतदार संघात तगडा उमेदवार द्यायचा होता त्यामुळे भाजपडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा काँग्रेस आघाडीसाठी मोठा धक्का होता. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर माढ्याची उमेदवारी देखील देण्यात आली. सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ३६ चा आकडा आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यात राजकीय वैर आहे. त्यामुळेच रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे. रणजित निंबाळकर हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र असून, फलटण तालुक्यात दुग्ध व्यवसायातील बढे प्रस्थ आहे. याचा फायदा भाजपाला होणार आहे.
एकूणच काय बारामती, नांदेड आणि माढा हे तिन्ही मतदार संघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जातात पण यंदाच्या निवडणुकीत मात्र नाट्यमय घडामोडी घडत हे तिन्ही मतदार संघ डेंजर झोनमध्ये असल्याचे दिसत आहेत. आता या तिन्ही मतदार संघात काय निकाल येणार ? याबाबत उत्सुकता लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी हे तीन बालेकिल्ले राखणार की भाजप हे किल्ले जिंकणार हे आता येणारा काळाच ठरवेल.