सेनेच्या चंद्रकांत खैरेंचा बाण ‘भात्यात’च ; औरंगाबादमध्ये ‘वंचित’चे इम्तियाज जलील ‘एवढ्या’ मतांनी विजयी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक नाट्यमय घडामोडींमुळे गाजलेल्या औरंगाबाद मतदार संघात शेवटपर्यंत चुरशीची लढत झाली. तिरंगी झालेल्या या लढतीत इम्तियाज जलील यांचा ६,०६७ मतांनी विजय झाला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव तर यांच्यात लढत झाली. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना ३,८१,९७५ मते पडली तर एमआयएमचे इम्तियाज जलील यांना मते ३,८८,०४२ पडली तसेच शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांना २८,१९,०८ मते पडली. या मतदार संघात मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणलेली होती.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात एकूण मतदार १८ लाख ८४ हजार ८६६ मतदार आहेत. त्यापैकी एकूण ११ लाख ९५ हजार २४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . या मतदार संघात ५९. ४५% टक्के मतदान झाले होते.

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मनाला जातो. चंद्रकांत खैरे हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे सलग चार वेळा खासदार झाले आहेत. यावेळी मात्र काँग्रेसचे सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान उभं केलं होत. भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसने पक्षाने सुभाष झांबड यांना तिकीट दिल्यामुळे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड केले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश पाटील यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे यांना ५ लाख २० हजार ९०२ मतं मिळाली तर सुरेश पाटील यांना ३ लाख ५८ हजार ९०२ मतं मिळाली होती.

औरंगाबाद मतदार संघ

एकूण मतदार – १८, ८४ , ८६६

एकूण मतदान – ५९. ४५%

विजयी उमेदवार – इम्तियाज जलील ( वंचित बहुजन आघाडी )

मिळालेली मते – ३,८८,०४२