आम्ही सत्तेत आल्यास २००९ सारखीच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू : सुप्रिया सुळे

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – २००९ मध्ये आमचे सरकार आल्यावर जशी कर्जमाफी केली होती तशी यावेळस जर सत्ता आली तर या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत त्यांनी हे आश्वासन दिले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघातून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित प्रचार सभेत बोलतांना भाजपाने पाच वर्षांत काम न करता नुसती आश्वासने दिली. काहीच काम नसल्यामुळे वैयक्तिक टिका करण्याचा सपाटा लावला आहे. ही आमच्या कुटुंबाची निवडणूक नाही तर ही देशाची, देशातील शेतकर्‍यांची निवडणूक आहे. २००९ मध्ये आमचे सरकार आल्यावर जशी कर्जमाफी केली होती तशी यावेळस जर सत्ता आली तर या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या मुकबधीर आंदोलकांवर राज्याच्या गृहमंत्र्यांनी लाठीचार्ज केला. तुम्ही एक बोट आमच्याकडे दाखवता त्यावेळी तीन बोटं तुमच्याकडे राहतात हे लक्षात घ्या असेही त्यांनी म्हंटले. तसेच, आमच्या आबांनी आया बहिणींचे संसार उध्वस्त होवू नये म्हणून राज्यातील डान्सबार बंद केले. परंतु, भाजप सरकारने हेच डान्सबार पुन्हा सुरु केले आहेत. ही सत्याची व असत्याची लढाई आहे. आपण सत्याचा मार्ग अवलंबला आहे. असेही त्यांनी म्हंटले.

तसेच यावेळी त्यांनी औषधांच्या किमती वाढल्या, गॅससिलेंडरचे दर वाढले आहेत याची आठवण करून देताना आता दारात येणार्‍या भाजपवाल्यांना लांबुनच नमस्कार करा असे आवाहनही त्यांनी केले.