मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडले. अशा रितीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांसाठी मतदानाचा कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण झाला. आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये १७ लोकसभा मतदरासंघांकरिता अंदाजे ५७ टक्के मतदान झाले असून राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी ६०.६८ टक्के मतदान झाले. आज पार पडलेल्या निवडणुकीत कल्याणमध्ये सर्वात कमी ४४.२७ तर सर्वात जास्त नंदुरबारमध्ये ६७.३४ टक्के मतदान झाले.
महाराष्ट्रामध्ये एकूण ८ कोटी ८५ लाख ६४ हजार ९८ मतदारांपैकी ५ कोटी ३७ लाख ४१ हजार २०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली. राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचे कुमार यांनी सांगितले. राज्यात आज उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई , दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, भिवंडी, कल्याण, ठाणे, पालघर, नंदुरबार, मावळ, धुळे, शिर्डी , शिरुर, नाशिक, दिंडोरी या मतदारसंघात मतदान झालं.
सन २०१४ च्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचे प्रमाण सारखेच राहिले असल्याचे अश्वनी कुमार यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, आबासाहेब कवळे उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात चारही टप्प्यात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये सांगताना कुमार म्हणाले की, कडक उन्हाळ्याचे दिवस असूनही मतदानाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीज यांनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले. शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही मतदानाचे प्रमाण चांगले राहिले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे ७ लाख ४९ हजार ३७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे १ लाख ४ हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती.
एकूण सुमारे साडे आठ लाख कर्मचारी या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते. यावेळी राज्यामध्ये प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्याकरिता एकूण १ लाख ८५ हजार ८५० (बीयू), १ लाख १७ हजार १३९ (सीयू) आणि १ लाख २३ हजार २०६ व्हीव्हीपॅट वापरण्यात आले.
राज्यात चौथ्या टप्प्यात गोपाळ शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, पूनम महाजन, प्रिया दत्त, अरविंद सावंत, मिलिंद देवरा, गजानन किर्तीकर, संजय निरूपम, अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार, आढळराव पाटील, अभिनते अमोल कोल्हे, समीर भुजबळ या चर्चेत राहिलेल्या नेत्यांचे भविष्य इव्हिएम मशिनमध्ये कैद झाले आहे.
आजच्या निवडणुकीची मतदारसंघनिहाय आकडेवारी